राज-उद्धव पेक्षा मुंबईच्या प्रश्नांकडे पाहा   

राज यांनी माध्यमांना सुनावले

मुंबई, (प्रतिनिधी) : शहरांच्या प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे. प्रसारमाध्यमांनी अनेक दिवस राज-उद्धव एकत्र येणार का? याच्या बातम्या चालविल्या. तितकीच प्रसिद्धी तुम्ही आज जे प्रवासी मरण पावले त्यांच्या बातम्यांना देणार का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांना करत शहरांच्या प्रश्नांवरही बातम्या करा, अशा कानपिचक्या दिल्या. रेल्वेमंत्री यांचा राजीनामा कशाला मागायचा? त्यापेक्षा त्यांना या ठिकाणी जाऊन लक्ष द्यायला सांगा, असेही ते म्हणाले.
 
मुंबईत लोकल अपघात होत नाही, असा एकही दिवस जात नाही. शहरांचा केवळ विचका उडाला आहे. बाहेरून येणार्‍या लोंढ्यांमळे रेल्वे कोलमडली आहे. सगळे जण निवडणुकांच्या प्रचारात गुंतले आहेत. शहरे म्हणून बघायला कोणी तयार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करुन राज म्हणाले, केंद्र सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. रेल्वेसाठी वेगळे महामंडळ तयार केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुंबईतील लोकलसेवा चालते तरी कशी हेच आश्चर्य असल्याचे सांगून राज म्हणाले, हा विषय केवळ रेल्वेपुरता मर्यादित विषय नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली शहरांचा पूर्णपणे विचका झालेला आहे. ठीक रस्ते नाहीत, पार्किंग नाही. केवळ उंच इमारती उभ्या राहत आहेत. कुठे आग लागली तर अग्नीशमन दलाचा बंबही आत शिरू शकत नाही, अशी अवस्था आहे. बाहेरून लोंढे येतच आहेत. यामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे. वाहनांना रस्ते नाहीत. चालायला पदपथ नाही. पण, मेट्रो आणि मोनोरेल सुरू आहेत. त्यामुळे प्रश्न सुटेल असे नाही. मेट्रो-मोनो सुरू झाल्या तरी नवीन वाहनांची नोंदणी थांबलेली नाहीत. 

मी ही लोकलने प्रवास केला

मी देखील कॉलेजमध्ये असताना हार्बर रेल्वेने प्रवास केला, अशी आठवण राज यांनी सांगितली. मला लोकल प्रवाशांच्या व्यथा कळतात. आजही सायंकाळी रेल्वे फलाटावर शिरायलाही जागा नसते. रेल्वे शिरणे तर सोडूनच द्या. पण, या अवस्थेतही त्या प्रवाशांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य असते, असेही राज म्हणाले.
 

 

Related Articles